रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

आवर्जून खावासा ‘गुलाबजाम’!!


मी खरंतर खाद्यप्रेमी माणूस आहे, पण तरीही गुलाबजाम हा पदार्थ माझ्या आत्यंतिक आवडीचा आहे. म्हणूनच ‘गुलाबजाम’ नावाचा पदार्थ पडद्यावर वाढला जाणार आहे असं जेव्हा कळलं तेव्हा पासून त्या क्षणाची पानासमोर पाटावर बसून आतुरतेने वाट बघत होतो आणि तो पडद्यावर वाढला गेला.

चित्रपट हा एखाद्या पाककृतीसारखाच असतो. कल्पनेचं साहित्य, त्यावर प्रोसेस करून केलेली संहिता, मग त्यावर एकेक कृती करत झालेली चित्रपट नावाची डिश या सगळ्या गोष्टी जमून यायला हव्यात आणि इथं ‘शेफ’ हा अस्सल खवय्या होता त्यामुळे ही ‘फूड फिल्म’ जमून येणार हे नक्कीच होतं.


हि कदाचित पहिली मराठी ‘फूड फिल्म’ असावी. फूड फिल्म म्हणजे अशी फिल्म ज्यात इतर साहित्य तर असतंच पण त्याचजोडीने एखाद्या ठिकाणचं फूडकल्चर हे कथानकाचा  प्रमुख भाग असतो. हॉलीवूडमध्ये अशा काही फिल्म्स आहेत पण बॉलीवूडमध्ये मात्र असा प्रयत्न झालेला दिसत नाही आणि म्हणूनच सचिनचं कौतुक वाटतं.  सचिन कुंडलकर हा माणूस खवय्या, फिरस्त्या, ब्लॉगर, लेखक आणि दिग्दर्शक आहे. या सगळ्या भूमिका पार पाडत असताना ‘गुलाबजाम’ ही कथा त्याच्या आतून आली असावी; पण त्याचजोडीने व्यावसायिकतेशी त्याची उत्तम सांगड घालण्यात आली आहे.  


फॉरेननमध्ये पंजाबी/उडिपी हॉटेल्स वगैरे सुरु झाल्याचं आपल्या कानावर आलेलं आहेच, पण पारंपारिक मराठमोळ्या हॉटेल्सची वानवा आहे. तसेच पुण्यात बरेच बॅचलर्स रूममेट्स म्हणून राहतात, त्यांना घरच्या जेवणाची ओढ असते. यामुळेच 'डबे' हा नवा लघुउद्योग पुणे-मुंबईसारख्या शहरात फोफावतो आहे. ह्याच विषयाला धरून कथानक रचण्यात आलं आहे. 


कथा हा पदार्थ पडद्यावर वाढत असताना तो उत्तम असण्यासोबतच उत्तम दिसणंही आवश्यक असतं.  याचसाठी वाढत असताना त्या-त्या जागेवर तो-तो  घटक वाढण्यात यायला हवा आणि कल्पकतेने सजवला तर उत्तमच, थोडक्यात पटकथा उत्तमरित्या लिहिली जायला हवी आणि  त्यावर संवादांचं गार्निशिंगही उत्तम हवं. तेजस मोडक आणि सचिन कुंडलकर ह्या जोडीने तीनही आघाडींवर उत्तम ‘कुकिंग’ केलंय. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती पडद्यावर दिसतेच, पण त्याचजोडीने संवादांतून ऐकूही येते हे महत्त्वाचं!


ही कथा आहे आदित्य आणि राधाची. पण एका सरळ रेषेत सांगता येण्यासारखं यांचं नातं नाही, ते गुंतागुंतीचं आहे. या नात्याचे सुरुवातीला गुरु-शिष्य, मग फुलत गेलेली मैत्री, त्या मैत्रीचं एक वळण असे वेगवेगळे कंगोरे उत्कृष्ट पद्धतीने रेखाटले गेले आहेत आणि म्हणूनच चित्रपट वेगळा ठरतो. हे नातं असं सरळसोट नसल्यानेच त्यातल्या भावनिक प्रसंगांमध्ये  वैविध्य आहे. पण त्याचवेळी एखादा सीन सरळसरळ स्पूनफीडिंग केल्याने कृत्रिम वाटण्याची शक्यता आहे. पण तरीही तो एखाददुसरा सीन सोडला तर चित्रपट उत्तम जमून आला आहे.


राधा आगरकर आणि आदित्य नाईक या दोन्ही भूमिका सोनाली आणि सिद्धार्थ यांनाच डोळ्यांसमोर ठेवून लिहिल्याचं अनेक प्रसंगांमध्ये जाणवतं. म्हणूनच कि काय दोघांनीही तुफान बॅटिंग केलीय. दोघांच्याही कारकिर्दीत हा एक उत्तम चित्रपट आणि त्यात एक उत्तम भूमिका यांचा समावेश झाला आहे. सिद्धार्थ चांदेकरने handsome, dashing, पण त्याचवेळी कॉर्पोरेटमध्ये work satisfaction नसणाऱ्या तरुणाची भूमिका समर्थपणे पेलली आहे. त्याच्या काहीकाही भावमुद्रा तर ठसल्या आहेत. सोनाली कुलकर्णी ही 'काकूबाई' आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पण त्याचवेळी तिचं हे 'काकूबाईपण' तिच्या पथ्यावरच पडलं आहे. तिच्या खाष्टपणाला त्यामुळेच एक मराठमोळी झालर आली आहे.         


चित्रपट मुख्यतः दोघांवरच आधारित असला तरीही रेणुका शहाणे हे सरप्राईज पॅकेज आहे  आणि वाट्याला आलेली छोटी पण अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली आहे. राधाकडे कामाला असणाऱ्या मावशींचा विशेष ठसका आहे, त्याचजोडीने पोपट छोट्या भूमिकेत समर्थपणे उभा राहिला आहे. त्याचजोडीने चिन्मय उदगीरकर आणि मधुरा देशपांडे यांनीही त्यांच्या छोट्या भूमिका चांगल्या निभावून नेल्यात. [पण तरीही प्रश्न पडतो, मधुरा देशपांडेऐवजी दुसरी कोण असू शकली असती?] याचजोडीने काल म्हटल्याप्रमाणे ‘रंगीत शहरातली चक्रम माणसं’ फार जशीच्या तशी आली आहेत. 

पण याचजोडीने यात आलेले पदार्थ; विशेषतः गुलाबजाम, पुरणपोळी, साध्या पोळ्या हे पदार्थ मुख्य पात्रंच आहेत असं वाटतं. म्हणूनच ही एक ‘फूड फिल्म’ म्हणून वेगळी ठरते.  


एखाद्या पदार्थाची फोटोग्राफी करत असताना तो उत्तम दिसण्यासोबतच आकर्षकही दिसावा लागतो आणि फोटोग्राफीचं मुख्य कौशल्य म्हणजे पदार्थाने बघणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. सचिन कुंडलकरच्या पहिल्या फिल्मपासूनचा त्याचा मित्र सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग याच्या कौशल्याने नानाविध पदार्थ दिसत असताना आपल्या आतला खवय्या TEMPT होत राहतो. हे करत असताना त्याने मुबलक प्रमाणात केलेला TOP ANGLESचा वापर प्रामुख्याने लक्षात येतो. सिद्धार्थच्या TOP ANGLESमुळे त्याच्या प्रसंगातली INTENSITY अधिक गडद झाली आहे. त्याचजोडीने सिद्धार्थ-सोनालीच्या अनेक फ्रेम्स ह्या काही बोलण्याच्या आधीच फार बोलून जातात. पुण्याचं आणि लंडनचं  जीवन उत्तम पद्धतीने रेखाटलं गेलंय, मुख्यतः या दोन्ही जीवनशैलीतला फरक सुस्पष्टरित्या दाखवण्यात आला आहे.    

 लोकेशन्स रिअल असतीलही पण  त्यात पुण्याचं पुणेपण आणि लंडनचं लंडनपण टिकून आहे. पदार्थ एरवी असतात त्यापेक्षा सुयोग्य आणि सुबक असणं अत्यावश्यक होतं तेही उत्तम झालंय.

त्याचजोडीने लाईटमनचं काम वाखाणण्याजोगं आहे. आधी स्वतःला घरात कोंडून घेणारी बाई आणि नंतर आदित्यच्या सोबतीने तिच्यात आणि तिच्या घरात होत गेलेले बदल लाईटसेटिंगमधूनही उत्तमरित्या CAPTURE झालेत.


उगाच पार्श्वसंगीताचा मारा नाहीय, जे आहे ते उत्तम आणि आवश्यक आहे.


या सगळ्या सोबतीने VFXचं काम उत्तम जमलंय. आधी टायटलला गंमतीखातर वाचलेलं ‘रुचकर पदार्थ’ हे पुस्तक आठवलंच पण त्यानंतर आदित्य शिकत गेल्यानंतरचा प्रवास VFXमधून उत्तम दाखवला गेला आहे.

विशेषतः राधा आगरकर ही आयुष्याच्या एका बिंदूवर अडकलेली आहे हे दाखवण्यासाठी घरातल्या वस्तू या मुद्दाम त्याच काळाच्या दाखवण्यात आल्या आहेत, त्याच जोडीने तिच्या खाली राहणारे काका वाचत असलेलं पुस्तक हे काळचक्राबद्दलचा आहे; पण त्याचवेळी रणबीरचा समर्पक वापर हा ही दरी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतोच पण त्याची घालण्यात आलेली सांगड वाखाणण्याजोगी आहे.


अनेक  ठिकाणी अनेक गोष्टींचा संयुक्तिक वापर आला आहे. विशेषतः भिंतीवर उगवलेलं पिंपळाचं रोप, मांडणीला लागलेली कोळीष्टके, रणबीरचा मुखवटा, खिडकीला केलेलं 

वर्तमानपत्रांचं आच्छादन,  मिठी दाखवण्याचं कौशल्य आणि इतर अनेक गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत.

थोडक्यात २०१८च्या ‘बेस्ट ऑफ मराठी’ लिस्टमध्ये ‘गुलाबजाम’ असायला काहीच हरकत नाही.  तुम्ही जर खवैय्या असाल किंवा रसिक असाल तर हा चित्रपट चुकवू नका’च’.  


खवैय्या रसिक;

सर्वेश शरद जोशी
       




बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

शेवटची भेट


शांत आणि विश्रांत कातरवेळ! अजूनतरी नाईटलाईफचं पाऊलही न पडलेला आरेवारे जवळच्या एका छोट्याशा खेड्यातला निर्जन किनारा! त्या किनाऱ्याच्या एका बाजूला नारळीपोफळीची लांबच्या लांब बाग आणि दुसरीकडे भरती आलेल्या समुद्राची गाज! या अशा शांत समुद्रकिनाऱ्यावर भेटलेले ते दोन जीव; स्वतःच्याही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडलेले आणि स्वतःपेक्षा जास्त प्रेम एकमेकांवर करणारे ते दोन प्रेमी जीव!

आता त्यांच्याकडे होती फक्त एक संध्याकाळ! गेले १५ दिवस ते रोज संध्याकाळी एकत्र फिरायचे. तोच समुद्र, त्याच वाटा, तोच किनारा पण तरीही प्रत्येकवेळी वेगळा भासायचा. एरवी भडाभडा बोलून जाणारी ती आज मुकी झाली होती आणि एरवी तिचं ऐकून घेणारा तो आज सतत काहीनाकाही करून तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी तोही गप्प झाला. पूर्ण किनाऱ्यावर एक सशब्द शांतता!

आपली कहाणी पूर्ण होणार नाही हे त्यांना माहीत नव्हतं का? नाही. पहिल्याच भेटीत “लग्नापूर्वी काही दिवस आपल्या गावी काढण्यासाठी आलेय”; हे तिने त्याला सांगितलं होतं. पण तरीही ते प्रेमात पडले, खरंच प्रेमाची सुरुवात नकळत होते पण….! त्याचे लाडके वपु म्हणतात ना “एक क्षण भाळण्याचा बाकी सगळे सांभाळण्याचे” त्यांनी एकमेकांना सांभाळायचं ठरवलं होतं, म्हणूनच पापण्यांच्या कडांशी आलेलं पाणी डोळ्यांतून बाहेर यायचं नाव घेत नव्हतं. ते बाहेर येणारच नव्हतं. ‘मी रडलो तर तिचं काय होईल?’ हाच विचार त्याच्या मनात होता आणि तिनेही हाच विचार करून स्वतःच्या अश्रूंना बांध घातला होता.

एव्हाना अंधार पडू लागला होता. दोघेही एका दगडावर बसले होते, दोघांच्याही नजरा क्षितिजावर खिळल्या होत्या. कदाचित आपलं स्वप्न दूर दूर जाताना दिसत असावं त्यांना. तेवढ्यात त्याची नजर चंद्रावर खिळली. “आजचा चंद्रही वेगळा आहे गं”; एवढंच तो पुटपुटला तेव्हा कुठे हरवलेली ती भानावर आली. खरंच असा चंद्र तिने कुठेच पाहिला नव्हता. एरवीच्या चंदेरी रंगाची झाकही नव्हती, काळसर पिवळा असा अत्यंत मलूल रंग होता त्याचा. जणू ह्यांच्या मनाचं प्रतिबिंबच आभाळात उमटलं होतं.

चंद्राकडे बघताना नकळत पापण्यांचा बांध निखळला आणि डोळ्यांतून पाऊस बरसू लागला. दोघेही एकमेकांपासून लपवण्याचा प्रयत्न करत असले तरीही अश्रूच ते, थोडीच लपणारेत.

दोघेही कितीतरी वेळ एकमेकांच्या नजरा चोरत एकदुसऱ्याला नजरेत साठवण्याचा प्रयत्न करत होते, पण नजरच ती! अचानक दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये मिसळल्या आणि घात झाला. दोघेही निःस्तब्ध झाले. एकमेकांच्या सोबतीने आजवरच्या १५ दिवसांच्या आठवणींची सफर करून आले. उत्सवाच्या पहिल्या दिवशी रात्र जागवतानाच एकमेकांकडे चोरून पाहत म्हटलेलं ‘हृदयी वसंत फुलताना’चं ड्युएट आठवलं. एरवी हौशीने गाणाऱ्या दोघांनाही त्या गाण्याची आठवणही नकोशी वाटत होती. तेव्हापासूनच तर  दोघांच्या मनात ‘वसंत’ खऱ्या अर्थाने फुलू लागला होता आणि तो त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या तरुणमंडळींना जाणवला होता. कदाचित मोठ्यांनाही जाणवला असावा, उगाच का त्याच्या आईने दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याला सांगितलं; “सदाभाऊंकडे आलेली ती पोर मोठी संस्कारी आहे बाकी, लग्न ठरलंय म्हणे तिचं. ज्या घरात जाईल त्या घराचं गोकुळ करेल हो.” मग त्याच दिवशी दुपारी सगळी मित्रमंडळी ग्रामदैवत, कुलदैवत वगैरे फिरायला निघाली तेव्हा
मुद्दामून दोघांना omniच्या पाठच्या सीटवर बसवलं गेलं आणि तेव्हापासून सुरू झालेला नात्याचा प्रवास इथवर आला होता आणि आता लवकरच त्याला पूर्णविराम मिळणार होता. ह्या सगळ्या आठवणी दोघांनाही shift+delet करावी लागणार होती.

कित्तीतरी वेळ दोघेही एकमेकांमध्ये बंदिस्त झाले होते.

तेवढयात तोच भानावर आला. “चल निघुया”; इतकंच म्हणाला. “निघायला हवंच का?” तिने कापऱ्या आवाजात विचारलं. आवाजातली वेदना लपवत तो इतकंच उत्तरला, “आता निघालो नाही तर आपण निघूच शकणार नाही इथून”

“जरा थांब” असं म्हणून तिने पर्समधून पत्रिका काढली.
“घाबरू नकोस नाही येणार मी” असं म्हणताना तो आपल्या आवाजातला कंप लपवू शकला नाही.
“आता यापुढे आपली भेट?” हा तिचा प्रश्न येणार ह्याचा अंदाज होताच.
“नकोच. तुझ्या आयुष्यात माझ्यामुळे कुठलंही वादळ नकोय मला. आपण आपल्या आठवणींत राहूच, इथली घटकाभराची सोबत सुटली तरीही तिथली सुटणार नाही, … कधीही!” शक्यताही त्याने ठामपणे नाकारली आणि हातात धरलेला हात सुटल्याची तिला जाणीव झाली.
“चल निघते मी!” एवढंच म्हणाली ती; “सुखी रहा गं” एवढंच तो म्हणू शकला.

ती निघालीही. एरवी पाठी वळून ती नेहमी bye करायची आणि तिच्या वळण्याची तोही वाट बघत रहायचा. आज तो त्याच ठिकाणी थांबला होता पण तरीही तिने वळून पाहू नये एवढंच त्याला वाटत होतं आणि bye म्हणणं तिलाही जमणारं नव्हतं. त्याने कितीतरी वेळ तिला पाठमोरं पाहून घेतलं, शेवटचं! ती नजरेच्या आड हरवली तरीही त्याची नजर त्याच दिशेने खिळून राहिली होती.

परतताना फक्त तो दोन ओळी गायला,

“दूर राहिले गाव सखे गं पैलतीरी
उरले ओघळते घाव सखे गं पैलतीरी”

✍सर्वेश शरद जोशी©

रविवार, २३ एप्रिल, २०१७

पुस्तके आणि मी


आज ‘जागतिक पुस्तक दिन’ आहे म्हणे, तसा मी तो माझ्यासाठी जवळजवळ रोजच असतो. ह्याचं कारण म्हणजे माझं आणि पुस्तक यांचं घट्ट मैत्रीचं नातं !

मला आठवतही नाही कि वाचलेलं पहिलं पुस्तक कुठलं आणि ते नेमकं कधी वाचलं, पण मला काहीच कळत नव्हतं तेव्हापासून हे नातं रोवलं गेलं असावं अशी माझी खात्री आहे. सुरुवातीला अंकालिपीतली बाराखडी, मग त्यातलेच ‘छगन कमळ बघ’ ‘मदन कमल बघ’ पासून ते आता पु.ल., व.पु., सु.शि., प्र.के. अत्रे (खरंतर ही यादी बरीच मोठी आहे) किंवा मग चेतन भगत, अमिश त्रिपाठी, रविंदर सिंघ त्यांच्या जोडीने Harry Potter वगैरे तुरळक कधीतरी परदेशी पाहुणे अशी अनेक लेखक-कवी मंडळी, अनेक पात्रे आमच्या ह्या नात्याचे साक्षीदार आहेत.

माझे बाबा नाटक, सिनेमा, पुस्तके यांच्या बाबतीत प्रचंड हौशी, तेच वेड माझ्याकडे आलं असावं असं काहींचं मत असलं तरीही माझं हे वेड जोपासण्याचं काम त्यांनीच केलं हे नक्की. त्यांच्या जोडीनं वाचनाची पुस्तकं हट्टाने विकत घेणारी चिन्मयदादा, चैतुताई अशी चुलत भावंडे असण्याच्या बाबतीत मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो, कारण त्यांची वाचून झालेली पुस्तकं नेहमी माझ्याकडे यायची. कधीकधी करिष्माताई, मनुदादाकडूनही पुस्तके यायची. बाजूच्या नितीनकाकांनी तर मुंजीच्या भिक्षावळीतून भा रा भागवतांचं ‘फास्टर फेणे’ सारखा एक सवंगडी ‘गुरुकुलाच्या प्रवासा’साठी सोबत दिला. माझ्या शाळेतले रसाळ सर यांची स्वतःची काही हजार पुस्तकांची लायब्ररी होती, आम्हा मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून ते नेहमी त्यांच्याकडची पुस्तकं वाचायला द्यायचे. त्यांच्या ‘स्मरणात राहिलेले विद्यार्थी’ ह्या सदरात माझा उल्लेख त्यांनी ‘पुस्तकचोर विद्यार्थी’ असा केला होता(असं असलं तरी आता घेतलेली पुस्तकं मी वेळेत परत करतो बरं!) , सोन्या-हिऱ्याची, पैशा-अडक्याची चोरी तर नेहमीच होते पण पुस्तकांची चोरी करणारी माणसं ही खरी बुद्धिमान असतात असं त्यांनी त्यात लिहिलं होतं. आता मी खरंच बुद्धिमान आहे, म्हणजे हे खरंच असणार म्हणा !

लहानपणी खेळायला गेल्यावर कोणाशीच पटायचं नाही म्हणून चिडून घरी यायचो, हळूहळू जायचंच बंद केलं, त्यावेळेपासून पुस्तकाच्या जगात भेटणाऱ्या वेगवेगळ्या सवंगड्यांनी माझ्याशी कथांचा सारीपाट मांडला, कवितांच्या कानगोष्टी केल्या, विनोदांच्या मैफिली रंगल्या आणि कोड्यांचे बुद्धिबळ खेळलो.

शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकं आवडीने वाचत असल्यामुळे माझा नंबर शाळेच्या हुशार विद्यार्थ्यांमध्ये लागायचाच पण अगदी दहावीतही शालेय पाठ्यपुस्तकाच्या आत अवांतर वाचनाचे पुस्तक ठेवून वाचल्यामुळे घरी आईबाबांचा आणि शाळेत शिक्षकांचा ओरडाही खाल्लेला आठवतो. दहावी झाल्यानंतर कॉलेजची लायब्ररी आपलीशी झाली आणि मोकळ्या वेळेत बरीचशी पुस्तकं वाचली जाऊ लागली. त्याच जोडीने ‘दादर सार्वजनिक वाचनालया’चा सदस्य झालो आणि माझ्या वाचनाच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत गेल्या.

वाचनाच्या कक्षा रुंदावत असतानाच जगण्याच्या कक्षासुद्धा रुंदावत होत्या. दुसरीत असताना ‘छान छान गोष्टी’ अभ्यासाला आलं आणि गोष्टी फक्त वाचण्यापेक्षा त्यांचा अभ्यास करू लागलो, आणि हळूहळू समीक्षण नोंदवू लागलो. चौथीपाचवीत असताना शाळेत ‘परिपाठ’ नावाचा तास सुरु झाला आणि त्यात पहिली गोष्ट सांगताना घाबरलेला मी हळूहळू कथाकथन करू लागलो. सहावी-सातवीत असताना माझं वाचन चांगलं आहे ह्या एकाच बळावर माझ्या शिक्षकांनी एका गोष्टीचं नाट्यरूपांतरण लिहायला सांगितलं आणि माझ्यात लेखकु पेरला गेला. वाचनामुळे नवनवे विषय, नवनव्या समस्या जाणवत होत्या, मुद्दे कळत होते, पटत होते/नव्हते, मग त्यातूनच वक्तृत्वस्पर्धेला गेलो आणि मग हळूहळू वक्तृत्वस्पर्धांच्या तयारीसाठी म्हणून वाचनात भर पडू लागली.

दहावीनंतर तर एक नवी लायब्ररीच ‘खुल जा झुक्याबा’ म्हटल्यावर हळूहळू उघडली गेली, सुरुवातीला काही वर्षं टाईमपास पुरताच मर्यादित असलेला तिचा वापर हळुहळू आजच्या पिढीच्या अनेक नव्या लेखकांची ओळख झाल्यामुळे वाढत गेला, अगदी ‘व्यसनात परावर्तीत झालाय की काय?’ अशी शंका यावी इतपत ! पण काही व्यसनं चांगलीसुद्धा असतात हेच खरं ! आताशा ह्या लायब्ररीत नित्यनियमाने येणारे अनेकजण ‘व्यसनेषु सख्यम’ न्यायाने मित्र झालेत.
वाचतावाचता लिहू लागलो, लिहितालिहिता छोट्यामोठ्या नाटिका दिग्दर्शित केल्या, अजून काही करायचं आहे, बरंच काही pending आहे, बरंच काही to do आहे, पण म्हणून काही हे सगळं करत असताना पुस्तकं वाचण्याचा, जमलं तर नवी नाहीतर जुन्या बाजारातली पुस्तकं विकत घेण्याचा, पुस्तकांच्या जगात रमण्याचा आणि तिथल्या नव्या सोबत्यांवर लेखन करून त्यांना ह्या जगात आणण्याचा माझा छंद काही कमी होणार नाही.



बरेचजण म्हणतात की वाचन कमी होतंय, वाचन कमी होतंय. पण वाचनाची माध्यमं जरी बदलत असली तरी वाचन तितकंच आहे. म्हणूनच तर प्रतिलिपी.कॉम किंवा ईबू.कॉम सारख्या वेबसाईट्स, ब्लॉग्ज, एफबीपेजेस दिवसागणिक वाढत जात आहेत. एक सांगावंसं वाटतंय, खरंतर अगदी आत्ता हे लिहितानासुद्धा मला एक सुगंध येतोय, कुठलंही नवं पुस्तक हातात घेतल्यानंतर येणारा त्याच्या पानांचा ! निदान त्या वासासाठी तरी पुस्तकं टिकून राहतील ह्या विश्वासावर इथेच थांबतो.

- सर्वेश शरद जोशी !

मंगळवार, १४ मार्च, २०१७

कितीवेळा (कविता)



कितीवेळा जपायचे मौनाने अंतर
मौनही मौनाने उकलायचे

कितीवेळा राखायचा अबोला स्वतःशी
शब्दही शब्दांशी बोलायचे

कितीवेळा धरायचा लटका रुसवा
रुसणेही हसण्याने विरघळायचे

तुझी साथ असता माझ्या सोबतीला
जगणेही अवचित हसवायचे  


© सर्वेश्वर जोशी

शनिवार, ११ मार्च, २०१७

प्रियेस पत्र (१)


प्रति,
प्रिया.

काय योगायोग आहे नं ? मी ऑनलाईन यायला आणि तू ऑफलाईन जायला एकच गाठ पडते हल्ली. पण मलाही आताशा वाटू लागलंय की बहुधा हे सारं तू मुद्दाम करत असावीस.
नाही, म्हणजे कदाचित तू हे जाणूनबुजून करत नसशीलही; पण आपलं मन वेडं असतं नं ! कुठल्याही प्रकारावर कुठल्याही पाली ('शंकेच्या' गं) चुकचुकत राहतात आणि आपल्या मनावर त्यांचंच राज्य आहे हे जाणवून द्यायचा प्रयत्न करतात.
आज बरोबर दोन वर्षं झाली. फेबुवर तूच मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलीस. तुझा तो प्रोफाईलफोटो बघितल्यावर मला राहवलंच नाही. मग काय केली रिक्वेस्ट ऍक्सेप्ट ! खरंतर तुझ्यासारख्या अनोळखी मुलीने रिक्वेस्ट पाठवणं मला थोडंसं आश्चर्यकारक होतं. मग नित्यनेमाने चॅट्स घडू लागले, त्यातूनच आपण दोघं एकमेकांना उलगडत गेलो, एकमेकांसाठी घडत गेलो आणि इतरांसाठी बिघडत गेलो. माझी प्रत्येक आवड-निवड तुला पाठ होत गेली, तुझी मला. इतकंच काय, एखादी बातमी 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून वारंवार ब्रॉडकास्ट होताना पाहिलीस की मग आपल्या चर्चा व्हायच्या. अनेकदा मी व्यक्त होण्याअगोदरच तू माझी मतं मलाच सांगू लागलीस; इतके आपण जवळ आलो होतो. जवळ येता येता प्रगल्भ होत होतो.
मग आपली भेट झाली, फार पूर्वीपासूनच अनेकांसाठी लव्हपॉईंट ठरलेल्या दादर चौपाटीवर. आपल्या बाजूचे अनेकजण, अनेक जोडपी ती तसली 'लव्हाळी' वाढवंत होती. आपण मात्र प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटत होतो. पण पहिल्यांदाच भेटत असलो; तरीही भेटीत पहिलेपणा, नवखेपणा अजिबात नव्हता. कारण या माध्यमाने आपण आधीच एकमेकांच्या जवळ येत होतो. पण तरीही लग्न होईपर्यंत आजूबाजूच्या 'लव्हाळ्यां'सारखं कधीच काहीच करायचं नाही हे तू तुझ्यापुरतं ठरवलं होतंस आणि त्यावेळी मलाही ते मान्य होतं.

मग काय, आपल्या भेटी वाढत गेल्या, मुंबईतला एकही लव्हर्स पॉईंट असा नाही जिथे आपण एकत्र गेलो नाही.
पण चार महिन्यांपूर्वी मी तुझं एका मुलाशी झालेलं Whastapp chatting बघितलं आणि माझं टाळकंच सटकलं. त्यानंतर मी तुला कधीच बोलू नये ते बोलून गेलो. खरंतर सुरुवातीची ५मिनिटे तू मला समजावण्याचा थांबवण्याचाही प्रयत्न केलास पण ते नाही जमलं तुला. अगदी तूच पुढाकार घेऊन ओठांवर ओठ ठेवलेस तरीही ते सुटल्यावर मी शांत राहिलो नाही. उलट तुझ्या कानफडात लावली.
मी नियंत्रणाबाहेर आहे हे लक्षात आल्यावर तू निघून गेलीस आणि याचाच मला जास्त राग आला.
तू मला सोडून गेलीस ह्यामुळे माझी अवस्था फार बिकट झाली. परंपरांचा वारसा जपणाऱ्या घरात माझं हे 'लव्हलफडं' कळल्यावर मला घरातून बाहेरच काढलं असतं. म्हणूनच घरच्यांना काहीही जाणवू न देण्याचा प्रयत्न केला.
पण या काळात मला एकटं रहावसं वाटत होतं आणि असा एकच वेळ होता माझ्याकडे.
झालं, कॉलेज बंक करून शांत ठिकाणी जाऊन बसू लागलो एकटाच. त्यामुळे परत माझ्या नुकसानात भरच पडली.शेवटच्या वर्षाचा अभ्यास सुटला. शेवटचं वर्ष हातातून जाण्याच्या बेतात असतानाच तुला एका मुलाबरोबर बघितलं आणि तुला भेटायला म्हणून तुझ्यासमोर आलो.
"हा राजेश, ह्याच्याशी माझं लग्न ठरलय" इति तू.
मग मी तरी काय बोलणार होतो ?? फक्त "शुभेच्छा" एवढंच म्हटलं, पुढे काय म्हणावं हेच सुचत नव्हतं आणि काही बोलायला जीभही वळत नव्हती.
त्यानंतरच हा योगायोगाचा खेळ सुरु झाला. म्हणूनच म्हटलं मगाशी कि बहुधा हे सारं तू मुद्दाम करत असावीस असं वाटतं ह्ल्ली !
तुझ्या लग्नाआधी मला तुला एकदा भेटायचंय. नाही, पुर्वीसारख नाही, तुझी माफी मागायला, तुझी परवानगी असेल तर तुझ्या कुशीत येऊन रडायला, तुला तुझ्या उर्वरित आयुष्याच्या शुभेच्छा द्यायला आणि...
.... आणि एक वचन द्यायला कि.....
"मी तुझ्याशिवाय हि आनंदात राहायचा प्रयत्न करीन"
कारण मला माहितीय मी आनंदात नसेन तर तुही सुखी होणार नाहीस
आणि मी तुझ्या सुखासाठी स्वतःचा जीव ओवाळायलाही तयार आहे.


तुझ्याशिवाय
कोणाचाच नसलेला,
प्रेम
______________________________________________________

मूळ लेखक : श्रीसर्वेश्वर©
१२/३/२०१६

विशेष सूचना - सदर पत्र हे वैयक्तिक अनुभवांवर वगैरे आधारित नसून केवळ कविकल्पना आहे, तेव्हा गैरसमज नसावा.

शुक्रवार, १० मार्च, २०१७

गाव भावनांचा (भाग ४)


त्या रात्री मनवाला एक स्वप्न पडलं, ज्यात बरंच काही होतं, पण सारं अंधुक दिसत होतं. कोणाच्यातरी आयुष्याचा प्रवास असावा असा तिने अंदाज लावला, पण कोणाच्या ? ते काही तिला कळलं नाही. त्या स्वप्नात एक कुटुंब प्रवासाला निघालं होतं, सगळेच आनंदात होते, बऱ्याच दिवसांनी सुट्टीवर युएसला निघालं होतं. फ्लाईटने टेकऑफ केलं आणि.....

...आणि तेवढ्यात मनवाला जाग आली. तिला दरदरून घाम फुटला होता, तिचं डोकं प्रचंड जड झालं होतं, घशाला कोरड पडली होती, तिची वाचा बसली होती. जणू काही त्या स्वप्नाने ती तिच्याही नकळत हादरली होती, पण का ? हे तिलाही कळत नव्हतं. थोड्या वेळाने तिने गादीवर पुन्हा एकदा अंग टाकलं, झोपायचा प्रयत्न केला, पण त्या स्वप्नाने हादरलेल्या मनात भलभलते विचार येऊ लागले होते. तिने ते स्वप्नातलं कुटुंब नेमकं कोणाचं होतं हे आठवायचा उरलेल्या वेळेत प्रयत्न केले, पण जसजशी ती विचार करू लागली, तसतसं तिचं डोकं जास्तच जड होत गेलं. शेवटी डोकं धरून ती रात्रभर तशीच जागी राहिली. 

सकाळी तिच्या सासुबाईंना तिच्या अवस्थेवरून ती रात्रभर जागी असल्याचं कळलं. त्यांनी तिला सुट्टी घ्यायला लावली आणि डॉ. मनिष मेहतांना फोन लावायला सांगितला. डॉ. मनिष मेहता, मुंबईतले फेमस psychologist होते, त्यांचं diagnosis कधीही फुकट जात नसे. त्या अपघातानंतर मनवा त्यांच्याकडे treatment घेत होती, मध्ये काही दिवस त्यांच्या appointments घेण्याचा मनवा कंटाळा करू  लागली होती. कारण फक्त भूतकाळ न आठवणं सोडलं तर बाकी काहीच त्रास होत नव्हता आणि भूतकाळ जरी फारसा आठवला नाही तरीही आपल्याला काही फार फरक पडत नाहीय हे तिच्या लक्षात आलं होतं. खरंतर सासूबाई मागे लागायच्या पण ती त्यांच्याकडे कानाडोळा करायची. पण मितला भेटल्यापासून डोकं जड होणं, अंधारी येणं, चक्कर येणं, गरगरणं असा त्रास सुरु झाला होता. म्हणून तिने पुन्हा एकदा त्यांची treatment seriously घेतली होती.   

मित आणि मनवा दोघे त्यादिवशी संध्याकाळी ५ वाजता CCDमध्ये भेटणार होते, पुस्तकावर काम सुरु करायचं होतं. पण मनवाने त्याला घरी बोलावून घेतलं. मित तिच्या घरी पोचला; मनवाच्या सासुबाईंनी दरवाजा उघडला. मनवाच्या घरी ती आणि तिच्या सासूबाई, दोघीच राहत होत्या, आणि एका तरुणाच्या फोटोला हार घातला होता. हा बहुतेक मयूर असावात्या फोटोकडे बघत मित म्हणाला. तेवढ्यात मनवा आली, तिने सासुबाईंची मितशी ओळख करून दिली. मितचा चहा-नाश्ता झाला आणि तेवढ्यात मितजवळ बसलेल्या मनवाचं डोकं पुन्हा असह्य झालं. तिच्या डोळ्यांसमोर रात्रीचंच स्वप्न तरळू लागलं. मितने तिला तिच्या रुममध्ये जायला मदत केली आणि ती तिथे झोपली.

आता मितला तिच्या सासूबाईंशी बोलायला बराच वेळ होता, दोघांच्या गप्पा सुरु झाल्या, दोघे बाहेर हॉलमध्ये गप्पा मारत असले तरीही त्या अधूनमधून मनवाच्या रुममध्ये डोकावत होत्या.      

मितने बोलता बोलता विषय शिताफीने मयूर आणि मनवा यांच्या नात्याकडे नेला, कारण त्यातून मनवा आणि मानसी यांच्या संबंधाचा clue मिळेल अशी त्याला आशा वाटली आणि म्हणूनच मानसीचा शोध घ्यायची त्याची इच्छा परत बळावली.    

मयूर एक buisnessman होता, पण ५ वर्षांपूर्वी त्याला buisnessचं depression येत होतं.buisness बरोबरच स्वतःच्या तब्येतीकडेसुद्धा सिरीयसली बघण्याची त्याला सवय होती, म्हणूनच साध्या depressionसाठीही तो डॉ.मेहतांकडून treatment घेत होता, एकदा तिथेच त्याची आणि मनवाची भेट झाली आणि तो मनवाच्या प्रेमात पडला. खरंतर डॉ. मेहता तिला assylum मधून सोडायला तयार नव्हते, पण शेवटी त्यांना मयूरच्या प्रेमाची खात्री पटली आणि त्यांनीच तिचं कन्यादान केलं.मयूरच्या आईने म्हणजेच मनवाच्या सासुबाईंनी मितला सांगितलं.        
                       
मितने मनवाचा भूतकाळ शोधण्याचे प्रयत्न केलेत का ? असं विचारल्यावर १०वर्षांपूर्वी तिच्या flightचा accident झाला होता, एवढंच मेहतांनी सांगितल्याचं त्या म्हणाल्या. मितने त्यांच्याकडून डॉ मेहतांचा नंबर घेतला आणि तो तिथून निघाला.

तो direct डॉ. मेहतांना भेटायला त्यांच्या clinicमध्ये गेला, त्याने डॉक्टरांना मनवाबद्दल खोदूनखोदून विचारलं, पण मेहता आपल्या उत्तरावर ठाम राहिले आपण कोण तिचे ? आम्ही तिच्या नातलगांशिवाय कोणालाही तिची information देऊ शकत नाही.

कदाचित कोणीही नाही, पण कदाचित तिचं सर्वस्व आहे असं काहीसं लेखकी थाटातलं उत्तर मितने दिलं.

म्हणजे ? ” मितचे ते कोड्यात टाकणारे उद्गार ऐकून मेहतांनी विचारलं. तेव्हा मितने त्यांना मानसीबद्दल सांगितलं. तेव्हा कुठे डॉ. मेहता मितला मनवाबद्दल सांगायला तयार झाले. पण सांगायला सुरुवात करताना त्यांनी आपलं हसू मिशीमध्ये दडवलं, हे अस्वस्थ असूनही मितच्या नजरेतून सुटलं नाही.        
                          
जून २०१०ची घटना. मी त्यावेळी युएसमध्ये होतो, त्यावेळी मनूतिच्या parentsसोबत आमच्याकडे राहायला आली होती. तिचे बाबा आणि मी, आम्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र. त्यांची family युएसहून परत यायला निघाली,     फ्लाईटने न्यूयॉर्कवरून टेकऑफ केलं आणि...  
 आणि होऊ नये
तेच झालं. टेकऑफ नंतर फ्लाईटने स्पीड वाढवण्यासाठी म्हणून अधांतरी airportभोवती एक-दोन चकरा मारल्यातेवढ्यात प्लेनच्या मशिनचे जे दोन fans दोन्ही बाजूला प्लेनच्या पुढे वेगाने फिरत होतेत्यापैकी एक गळून धाडकन खाली कोसळला. त्या बरोबर प्लेनचा तोल जाऊन गटांगळ्या खात प्लेन धाडकन भोवतालच्या ग्राउंडवरच कोसळले. प्लेन फार उंचावर नव्हते. त्याचा वेगही फार नव्हता. पण इंजिन पेटायला तेवढं  पुरेसं होतं, इंजिन धडाडून पेटलं आणि त्यातच boardवरच्या कर्मचाऱ्यांसोबतच काही प्रवाशांनासुद्धा अपघाती निधनाला सामोरं जावं लागलं. जे जखमी होते, त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये admitकेलं गेलं. आणि तिथेच मिस्टर & मिसेस देशपांडे यांची डेथ झाली....

मेहता पुढे खरंतर बोलत होते, पण मितचे कान यापुढे काहीवेळ काहीच ऐकत नव्हते. कारण सुरुवातीला मनवाचं नाव न घेता तिला मनूम्हणणं आणि आत्ता मि & मिसेस देशपांडे असं म्हणणं ह्या दोन्हींचं कनेक्शन लावल्यावर सुरुवातीला मेहता का हसले हे मितच्या लक्षात आलं.

एक सेकंद, यु मीन टू से ...? ”
वेलडन माय बॉय ! आय मीन इट ! खरंतर मी मानसीच्या इतर नातेवाईकांचा शोध घेण्याचा ट्राय केला होता, पण I was unsuccessful. मग मनूला मीच सांभाळायचं ठरवलं. त्यानंतर एकदा मयूर इथे आला, त्या दोघांची भेट झाली,...”
पुढचं सगळं मला माहितीय, पण डॉ. मानसीचं नाव मनवा का सांगितलं तिने मला ? ” मितने मेहतांचे वाक्य तोडत त्यांना विचारलं.
  
कारण तिलाही तिचं नाव माहित नाही, rather than आठवत नाही. ती जेव्हा शुद्धीवर आली होती तेव्हा तिला फक्त एवढंच आठवत होतं, कि तिला कोणीतरी अगदी जवळचं मनुम्हणायचं. तिचं खरं नाव आता फक्त तिघांना माहिती असावं, मयूरला, मला आणि आता तुला. मयूर फार चांगला मुलगा होता, मानसीला जोपर्यंत काही आठवत नाही तोपर्यंत तिला अगदी फुलासारखं सांभाळायचं वचन तर त्याने दिलं होतंच पण त्याहूनही जास्त सांभाळत होता तिला. आता मनूला तो accident डोळ्यांसमोर दिसतोय, कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये सगळा भूतकाळ आठवेलसुद्धा, पण हे बघणं मयूरच्या नशिबात नव्हतं. बाकी काही म्हणा, आमची मनू फार नशीबवान आहे, आधी तुझ्यासारखा प्रियकर आणि नंतर मयूरसारखा नवरा ह्या दोन्हींसाठी नशीब लागतं. पण पोरीच्या भाग्याची नियतीशी जोरदार लढाई चालू आहे. आधी आई-बाबा, मग मयूर तिच्या जवळच्या सगळ्यांना नियतीने तोडलं. पण आता कदाचित तिचं भाग्य जिंकणार, नाही ते जिंकायलाच हवं मेहता भडाभडा बोलत राहिले, मित ऐकत राहिला. सगळं बोलून झाल्यावर मेहतांच्या लक्षात आलं की मितच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या.

ह्या सगळ्या घटनांना आता काही महिने उलटून गेलेत, मानसी उर्फ मनू उर्फ मनवाला आता सारा भूतकाळ आठवतोय, मित आणि मनूने एकत्र मिळून लिहिलेल्या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा आहे. त्यांनी त्या पुस्तकाखाली त्यांचं नाव कॉलेजमध्येच असताना ठरवल्याप्रमाणे मन-मितलिहिलंय. मितचे आणि मनवाचे बरेच fans कार्यक्रमाला आलेत, मिडियासुद्धा आहे. मित उर्फ मितेशचे आई-बाबा, मयूरच्या आई, डॉ. मेहता आणि मराठी वाङ्मय मंडळाचे जोशीसरसुद्धा आहेत, मनू anchoring सांभाळतेयकार्यक्रम रंगात आलाय. मनूने मितला बोलायला पोडीयमवर बोलावलं.

हे काय ? मितने आधीच कॉलरमाईक लावलाय ? पण का ?

मित एक कहाणी सांगू लागलाय, कहाणी भूतकाळच्या आठवणींची, कहाणी वर्तमानाच्या सोहळ्यांची, कहाणी भविष्याच्या स्वप्नांची, कहाणी मितेश आणि मानसीची, त्यांच्या मन-मितहोण्याची.
मितने मनूला मध्ये येण्याची रिक्वेस्ट का केली असेल ? त्या रिक्वेस्टवरतीच तो थांबला नाहीय. तो तिच्या हाताला धरून तिला स्टेजच्या मध्यावर घेऊन आलाय. आधीच ठरवल्याप्रमाणे लाईटवाल्याने फक्त मधलाच लाईट चालू ठेवलाय, fansचे डोळे आणि mediaचे कॅमेरे उत्सुकतेने बघत आहेत, pin-drop-silence पसरलाय, सेकंदासेकंदाने उत्सुकता वाढतेय आणि त्यासोबत वाढतोय तो romance ! कारण मित अगदी फिल्मी पोजमध्ये गुडघ्यावर बसलाय, आणि त्याने कविता म्हटली                 
 तुझ्यासाठी बांधिला मी गाव भावनांचा
तुझ्यासाठी घेतला मी ठाव आठवांचा
तुझ्यासाठी सोसला मी घाव आसवांचा
तुझ्यासोबत रचला मी दावा जगण्याचा
साथ दे तू मला, साथ दे तू मला  !!
अहाहा !  काय लाजलीय मनू, जणू काही त्या लाजण्यानेच उत्तर दिलंय.

एक कहाणी पूर्ण झालीय, भूतकाळावरची धूळ उडालीय आणि भविष्याचा दरवाजाही उघडलाय. आता दोघं मिळून नव्या कहाण्या रचतील, पण त्याचबरोबर रचतील यशस्वी संसार. हं, फिल्म सारखं & they lived happily ever after ’ म्हणणार नाही मी, कारण त्यांच्या भावी संसारात ते haapyच असतील असं मला वाटत असलं तरीही पुढे काय होईल हे मलासुद्धा नक्की माहित नाहीपण एवढं मात्र नक्की कि ते दोघे आता आयुष्यभरासाठी एकत्र असतील.                        

             

                                 

गुरुवार, ९ मार्च, २०१७

गाव भावनांचा (भाग ३)


असंच स्वप्न तो अजूनही पाहत होता, मानसी परत भेटण्याचं. आणि काही दिवसांपूर्वी त्याला अगदी मानसीसारखीच दिसणारी मनवा भेटली होती, जिचा स्वभावसुद्धा अनेक बाबतीत मानसीशी जुळत होता. पण असं का ? ती मानसीच होती का ? ते मानसी आणि/किंवा मनवा ह्या दोघांशिवाय कोणाला माहिती असू शकतं ? मानसी कुठे आहे हेही माहित नव्हतं त्याला, पण मनवा तर होती ना !   

मितच्या डोक्यात विचारांचं चक्रीवादळ घोंघावत होतं, पण तेवढ्यात अलार्म वाजला आणि रात्रभर स्वप्नांमध्ये, आठवणींमध्ये तळमळलेला, या कुशीवरून त्या कुशीवरून वळवळलेला मित उठून बसला. 

त्याने खिडकीतून बाहेर सूर्याकडे बघितलं आणि नमस्कार केला. त्याला आजचा सूर्य काहितरी वेगळाच वाटला. सूर्य तसा अगदी रोज नव्याने उगवत असतो, पण तरीही आजचा सूर्य त्याला अगदी नवा वाटला. थोड्यावेळाने त्याच्या लक्षात आलं कि सूर्य वेगळा नाहीय, तर आपण अनेक दिवसांनी त्याच्याकडे निरखून बघतोय. गेले काही दिवस, नव्हे गेली काही वर्षं त्याच्याकडे बघून आपल्या मनात विचार यायचा ‘हा का आला ?’; आज बऱ्याच दिवसांनी आपण त्याचं स्वागत करतोय. पण का ?

तेव्हा त्याच्या लक्षात आलं, आपला मार्ग आपल्याला मिळालाय. हि अनेक दिवसांपासून मनात घोळत असणारी ‘ती’ कहाणी आपण मनवाला सांगून बघू. कदाचित काहीतरी क्ल्यू सापडेल, बॉलीवूड फिल्म्स प्रमाणे मनवा आणि मानसी ‘जुडवा’ वगरे असतील तर....

कधी एकदा आपण मनवाला भेटतोय असं त्याला झालं आणि तो संध्याकाळची वाट बघू लागला. आपण काळासाठी थांबू शकतो, पण काळ कोणासाठीच थांबत नाही. मितचं व्रिस्टवॉच टिकटिक करत राहिलं आणि त्याने संध्याकाळी ४वाजल्याचा अलार्म झाला. हो, हे wristwatch मितच्या वाढदिवसाला ४ मार्च २००७ला  गिफ्ट केलं होतं, ते आजपर्यंत त्याने जपून ठेवलं होतं. अनेक interviewमध्ये त्याने सांगितलं होतं कि ते घड्याळ त्याच्यासाठी फारच special होतं. ते त्याला आज परत आठवलं, पण ते विसरायचा प्रयत्न करत त्याने कानात ईयरफोन्स अडकवले, रूमबाहेर पडला आणि बुलेटची चावी चाफेकळीत अडकवून ती गोलगोल फिरवत लिफ्टकडे गेला.        

आपल्या लाडक्या बुलेट वरून तो पटापट अंधेरीतल्या CCDमध्ये पोचला. मनवा आधीच तिथे येऊन तिच्या नेहमीच्या टेबलवर बसून Cappucino एन्जॉय करत होती. त्याने मनवाला Hie केलं आणि त्या टेबलकडे येऊ लागला. टेबलबाजूच्या चेयरवरती येऊन बसताना तो गाणं गुणगुणत होता,
कितीदा नव्याने तुला आठवावे,
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे” 
“ मला काही म्हणालास का ?” मनवाने विचारलं.
मितने कानातले इयरफोन काढत नाही सांगितलं, आणि तो कानात इयरफोन घालून ड्राईव्ह करत आला म्हणून मनवा त्याला ओरडली. त्याला पुन्हा मानसीच आठवली, कारण मानसीसुद्धा त्याला अशीच ओरडायची. अशा मनवाच्या कितीतरी साध्यासाध्या गोष्टींवरून त्याला मानसीच आठवायची. त्याने त्याच्यासाठी फिल्टर कॉफी ऑर्डर केली.  
तो खरंतर पुन्हा अस्वस्थ झाला होता, हल्ली मनवाशी फोनवर बोलताना सुद्धा त्याला रडायला यायचं. पण त्याने तरीही डोळ्यातलं पाणी लपवत मनवाला बोलायला सांगितलं. तेव्हा मनवाने तिने रचलेल्या एका कथेचा बेसिक ड्राफ्ट सांगितला. मितेशला तो भलताच आवडला. पण तरीही त्यातले बारीकबारीक loop-holes शोधून काढणं आवश्यक आहे हे सांगायला तो विसरायला नाही. 
 कहाणीत दोनच मुख्य पात्रं होती, ‘ती’ पोलीस कमिशनरची मुलगी आणि ‘तो’ एक tour guide होता. ते दोघे एका टूरवर भेटतात, प्रेमात पडतात, पण एके दिवशी ती kidnap होते आणि मग काय काय होते, ते पुन्हा भेटतात का ? असं सगळं थ्रील त्या कथेत असलं तरीही अनेक ठिकाणी लॉजिक नव्हतं, असं मितला वाटलं. पण मितला अजून एक गोष्ट आठवली, पूर्वी एकदा मानसीने सुद्धा बर्यापैकी सिमिलर कन्सेप्ट त्याला सांगितलं.
आता त्याने आडून आडून मनवाला तिच्या बालपणाबद्दल विचारायला सुरुवात केली.  दुर्दैव म्हणा किंवा सुदैव, पण मनवाला आजपासून ५ वर्षांपर्यंतच आठवत होतं. त्या आधीचं काहीच आठवत नव्हतं. तेव्हा तिने सांगितलं कि मयूरने मरताना तिला सांगितलं होतं कि ५ वर्षांपूर्वी तिचा अपघात झाला होता आणि त्यातच त्यांची भेट झाली होती. मयूर म्हणजे मनवाचा नवरा !
आपण मनवाला उगाचच विचारलं तिच्या भूतकाळाबद्दल, कदाचित तिला त्रास होईल यामुळे असं वाटून त्याने आता तिला मनवा म्हणूनच स्वीकारायचं आणि मानसीचा शोध थांबवायचा. त्याला खरंतर सकाळपासून मनवाला आपल्या आयुष्याची गोष्ट सांगायची होती, पण आता आपण आपल्या स्वार्थासाठी तिला त्रास देणं चुकीचं ठरेल म्हणून मित उर्फ मितेश त्याच्या आयुष्याबद्दल आणि ‘तिच्या’बद्दल काहीही सांगणार किंवा विचारणार नव्हता.
त्यानंतर दोघांनी अजून एक-एक कॉफी घेतली. एखाद्या माणसाची आठवण काढायची नाही असं आपण कितीही ठरवलं, तरीही यायची तेव्हा ती येतेच. आता ‘Cappucino’ मानसीला आवडणारा पदार्थ मनवाचाही आवडता असावा, याबद्दल विचार करायला मितच्या मनाने त्याच्याही नकळत सुरुवात केली. हं, आपण पुन्हा त्याच गोष्टींवर विचार करतोय हे मितच्या लक्षात आल्यावर त्या विषयावर विचार करणं त्याने सफाईदारपणे टाळलं.
कॉफीसोबत अजून गप्पा रंगल्या आणि मग दोघे तिथून निघाले. घरी गेले तरीही रात्री अगदी उशिरापर्यंत दोघांमध्ये chats रंगले. मनवा तर chat करता करताच गाढ झोपली, मितला आज झोप येईल असं त्याला वाटत नव्हतं म्हणून तळमळत, वळवळत राहण्यापेक्षा त्याने ‘ Eternal Sunshine of Spotless Mind ’ लावला.
त्या रात्री मनवाला एक स्वप्न पडलं, ज्यात बरंच काही होतं, पण सारं अंधुक दिसत होतं. कोणाच्यातरी आयुष्याचा प्रवास असावा असा तिने अंदाज लावला, पण कोणाच्या ?

______________________________________________
{ #Stay_Tuned }