गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

व्यथा समुद्राची !!!

स्थितप्रज्ञ समुद्रालाही कधीतरी वाटत असेलच ना कि,

नेहमी नदीनेच का येऊन आपल्याला भेटायचं ? आपल्याकडे येऊन तिनेच का आपल्यात मिसळून जायचं ? आपला खारटपणा कमी करण्याच्या प्रयत्नात तिने नेहमी स्वतःलाच का खारट करून घ्यायचं ?

कधीतरी आपणही जाऊन तिला भेटावं; तिच्याकडे जाऊन तिच्या बाहुपाशात सामावून जावं; तिच्या बाहुपाशात आपण असतानाहीे तिचा गोडवा टिकून रहावा; अशी भाबडी आशा त्याच्याही मनात कधीतरी उगवत असेलच ना ?

त्याला असं वाटत असेल नव्हे, तर त्याला असं वाटत असणारच.

पण त्याचं एक बरं आहे, त्याच्या ह्या 'असं' वाटण्याच्या झळांमुळेच तर त्याची वाफ होते, त्याच्या 'अशा' भावनेमुळेच तर त्याचे ढग होतात...

आणि मग योग्य वेळ येताच हाच समुद्र पाऊस होऊन बरसतो. मग त्याचाही झरा होतो, गोडवा असलेला ! तोही जाऊन बिलगतो नदीला; आणि आश्चर्य म्हणजे तो बिलगल्यानंतरही तिचा गोडवा टिकून राहतो. समुद्र बिचारा आपली स्वप्नं पूर्ण झाल्याच्या आनंदातच तिच्यात सामावून तिच्यासोबत वाहत राहतो.


मग एखाद्या अवचित क्षणी त्याला जाणीव होते की आपण असं येऊन बिलगलो तरीही आपल्या पूर्वीच्या स्थितप्रज्ञ रूपावर भाळलेली 'हि' धावतेच आहे अजूनही त्याच रूपाच्या दिशेने, त्याच ओढीने !

- सर्वेश शरद जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा